Tuesday, March 7, 2017

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत
मनरेगा सप्ताह ; आज, उद्या ग्रामसभा
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांची संकल्पना
नांदेड दि. 7 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व त्याअंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना औरंगाबाद विभागात प्रभावी व परिणामकारकरित्या राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 12 मार्च 2017 पर्यंत मनरेगा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
या सप्ताहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार 8 मार्च रोजी महिलांची विशेष ग्रामसभा व त्यानंतर गुरुवार 9 मार्च रोजी सर्वसाधारण विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभाद्वारे समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या सर्व लाभार्थ्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारीही सुरु केल्याची माहिती मग्रारोहयो जिल्‍हा कार्यक्रम समन्‍वय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
प्रत्‍येक ग्रामपंचायतीच्‍या ग्रामसभेसाठी तालुक्‍यातील वर्ग एक, दोन व तीन ( उपअभियंता, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, लागवड अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्‍ठ अभियंता, मंडळ अधिकारी, कक्ष अधिकारी, विस्‍तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी, कृषी अधिकारी इत्यादी ) कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात येत आहे.  हे संबधीत संपर्क अधिकारी 8 व 9 मार्च 2017 रोजी होणा-या ग्रामसभेस उपस्थित राहणार आहेत.
या ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती देणे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंतर्गत 11 कामांची माहिती देणे. ग्रामपंचायत अंतर्गत जॉब कार्ड मिळण्यापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना जॉब कार्ड देणे. उपलब्ध जॉब कार्डचे नुतनीकरण करणे. योजनेअंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 मध्ये घ्यावयाच्या कामांची निवड करणे. या दोन्ही वर्षांकरीता वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी लाभार्थी निवड करणे ज्यामध्ये सिंचन विहीर , वैयक्तिक शौचालय, शेततळे, फळबाग लागवड, शेळी-गुरे-कुक्कुटपालन शेड, शौषखड्डे, व्हर्मी / नाडेप कंपोस्टींग, वृक्ष लागवड आणि सार्वजनिक स्वरुपाच्या ग्रामसभलीकरण अंतर्गत कामांची निवड करणे. निवडलेल्या लाभार्थी कामे व या दोन्ही वर्षांकरीता वार्षिक कृती आराखड्यास मान्यता घेणे. आवश्यकता असल्यास शासन नियमानुसार अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेतून निवड करणे असे विषय ग्रामसभेसमोर ठेवले जाणार आहेत.
ग्रामसभेत समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या लाभार्थ्‍यांची नियमानुसार निवड होईल. यासाठी  तलाठी, ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी, कृषी सहाय्यक यांना सूचना देण्यात आल्या. ग्रामसभांचा विहित नमुन्यातील अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे एकत्रित केला जाणार आहे. 

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...