Friday, October 7, 2016


जलयुक्त शिवार अभियानाबाबत

पत्रकारांसाठी पुरस्कार योजना

नांदेड , दि. 7 :-  उत्कृष्ट लिखाणाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. यानुसार जलयुक्त शिवार अभियानात लिखाण केलेल्या पत्रकारांनी आपले प्रस्ताव 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करावेत.
जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यास योगदान देणारे पत्रकार पुरस्कारांसाठी पात्र राहणार आहे. मुद्रीत पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असे गट आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर तर इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी पुरस्कार दिले जाणार आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 35 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 25 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
विभागस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 30 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 20 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 15 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 12 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 51 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील दैनिके, साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा विचार केला जाईल. यासाठी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीतील लिखाणाचा विचार केला जाईल. इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी मराठी भाषेतील वृत्तकथेचा विचार करण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा मफुअ-2013/प्र.क्र.37/जल-8, दि. 28 सप्टेंबर 2016 हा शासन निर्णय पाहावा.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...